पोलिस प्रशासन न्यूज.

बीडमध्ये अतिवृष्टीमुळे नद्यांना महापूर, शेतीचे प्रचंड नुकसान; ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट मदत देण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी


बीड: गेल्या दहा दिवसांपासून बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे नद्या, नाले आणि धरणांना पूर आला असून, अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. या महापुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, उभी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भारत तांगडे यांनी या पार्श्वभूमीवर, तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची मागणी केली आहे.

​माजलगाव तालुक्यातून वाहणाऱ्या सिंदफणा नदीने रौद्ररूप धारण केल्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. गव्हाणथडी, काळेगाव थडी, महातपुरी, पुरुषोत्तपूरी, सादोळा, गंगामसला, सांडस चिंचोली, सुरुमगाव यांसारख्या गोदाकाठच्या गावांमध्ये शेतात पाणी शिरल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतजमिनी आणि विहिरीही वाहून गेल्या आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

​या गंभीर परिस्थितीची पाहणी करून तातडीने पंचनामे करावेत आणि केवळ पंचनाम्यांवर अवलंबून न राहता, सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून सर्व शेतकऱ्यांना कोणत्याही अटींशिवाय तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी भारत तांगडे यांनी केली आहे. या नुकसानीमुळे सरकारी मालमत्तेचेही कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे, मात्र शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अंदाज लावणेही कठीण असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे सरकारने या आपत्कालीन परिस्थितीत त्वरित हस्तक्षेप करून बळीराजाला दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.


6
कृपया वोट करा

NEW MAHARASHTRA LIVEच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!