बीड: सततच्या अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या कठीण काळात वंचित बहुजन आघाडीने हिरापूर, ईटकुर आणि आहेर चिंचोली शिवारातील शेतांची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष पुरुषोत्तम वीर, जिल्हा सह-संघटक अर्जुन जवंजाळ, शहराध्यक्ष लखन जोगदंड आणि कार्यकर्ते मिलिंद सरपते व अरविंद इनकर यांनी नुकसानीची पाहणी केली. शेतकरी बहिरामा आणि इतर शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये जाऊन त्यांनी पिकांच्या नुकसानीची माहिती घेतली.
या पाहणीनंतर, शेतकऱ्यांना केवळ आश्वासने न देता, तात्काळ मदत करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने शासनाकडे केली आहे. तसेच, शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती नुकसानभरपाई द्यावी असेही त्यांनी म्हटले आहे.
या संकटाच्या काळात वंचित बहुजन आघाडी शेतकऱ्यांच्या सोबत असून, त्यांच्या हक्कासाठी सदैव लढत राहील, असेही या वेळी सांगण्यात आले.













